सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात : कॉ. डॉ. भारत पाटणकर
schedule30 Jun 26 person by visibility 161 categoryउद्योग
◼️‘गोकुळ’मध्ये ४६ सेवानिवृत्त कर्मचारी व १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटना, आयटक आणि कॉ.अवि पानसरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळमधील ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कर्मचारी वर्गातील दहावी-बारावी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयातील कुरिअर हॉलमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रमिक मुक्ती दलाचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास गोकुळच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे कॉ. डॉ. भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "गोकुळसारख्या सहकारी संस्थेत सेवा करण्याची संधी मिळणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे भाग्य आहे. कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा पाया असलेला जिल्हा असून येथील सहकारी संस्थांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे सहकाराची ही परंपरा जपणे आणि अधिक सक्षम करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे." ते पुढे म्हणाले, "सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे. सेवाकाळात मिळालेला अनुभव समाज, शेती आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी उपयोगात आणला पाहिजे. गोकुळने दरवर्षी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि संस्थेशी त्यांचे नाते अधिक दृढ होईल."
"प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या सेवाकाळातील अनुभव लेखी स्वरूपात जतन करावेत. त्यातून भावी पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल. महाराष्ट्रातील ग्रामीण विकास, शेतीची प्रगती आणि आर्थिक उन्नतीचा पाया सहकारात आहे. त्यामुळे सहकाराची मूल्ये जपत समाजहितासाठी सातत्याने कार्य करणे हीच काळाची गरज आहे," असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रकांत परूळेकर यांनी दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा मालक असल्याचे सांगत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायात उतरून दूध उत्पादक म्हणून गोकुळच्या दूध संकलन वाढीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कष्टाच्या बळावर उभारलेल्या कार्याचा आदर्श आजच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कर्मचारी वर्गातील १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कर्मचारी संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, कृषी उत्पादने आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ज्येष्ठ भाकपचे कामगार नेते कॉ. दिलीप पवार, आयटकचे अध्यक्ष कॉ. एस. बी. पाटील, गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ.चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, गोकुळचे व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, डॉ. व्ही. डी. पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. मल्हार पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, जनरल सेक्रेटरी कॉ. सदाशिव निकम, संभाजी देसाई, संदीप लाटकर, लक्ष्मण पाटील, संभाजी शेलार, कृष्णात चौगले, लक्ष्मण आढाव, दत्ता बच्चे, योगेश चव्हाण, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सेवानिवृत्त कर्मचारी, यांचे कुटुंबीय उपस्थित होते.