गोरगरिबांचे रेशन बंद केल्यास रेशन दुकानदारांच्या दारात होणार नोटीसची होळी; करवीर शिवसेनेचा इशारा
schedule17 Jun 26 person by visibility 166 categoryसामाजिक
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांमार्फत अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे खळबळ उडाली आहे. या नोटीसमध्ये शिधापत्रिकेबाबत जाचक अटी लादल्या असून, लाभार्थी कंपनीचे संचालक नसावेत, आय.टी. रिटर्न भरणाऱ्यांना योजनेतून वगळणे अशा नियमांवर शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे.
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, आय.टी. रिटर्न भरणाऱ्यांना रेशन नाकारणे हा नियम अन्यायकारक आहे, कारण रोजगारासाठी हे लोक कर्ज घेतात. तसेच, अल्प भूधारकांना नोटीस देणे चुकीचे आहे. उपनेते पोपट दांगट यांनी, "मिशन सुधार राईटफुल टारगेट" अंतर्गत गरिबांचे रेशन बंद करण्याचा भाजप सरकारचा डाव शिवसेना हाणून पाडेल, असा इशारा दिला. जर नोटीसा मागे घेतल्या नाहीत, तर गावागावांत रेशन दुकानदारांच्या दारात या नोटीसची होळी करण्यात येईल.
यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा अधिकारी विकास देसाई यांनी या मागण्या वरिष्ठ पातळीवर पोहोचवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात राजू यादव, पोपट दांगट, बाळासाहेब नलवडे, जितू कुबडे, सचिन नागटिळक, राजू सांगावकर, प्रकाश मुदुगडे, दिनेश परमार, संतोष चौगुले, कैलास जाधव, दिपक पोपटाणी, सुनील पारपाणी, दिपक अंकल, किशोर कामरा, मोहन रजपूत व बाबुराव पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.