कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस: धरणांच्या पाणीपातळीत वाढ, १९ बंधारे पाण्याखाली
schedule21 Jul 26 person by visibility 137 categoryराज्य
कोल्हापूर: जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून पाटबंधारे विभागाने २१ जुलै २०२६ रोजीचा दैनिक पाणी पातळी अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असून काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
▪️प्रमुख धरणांची स्थिती:
राधानगरी धरण ७८ टक्के भरले असून त्याचा पाणीसाठा समाधानकारक आहे. तसेच घटप्रभा आणि जांबरे धरणे शंभर टक्के भरली आहेत. आजरा तालुक्यातील सर्फनाला मध्यम प्रकल्प २० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:४५ वाजता पूर्ण क्षमतेने भरला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
▪️नद्या व बंधाऱ्यांची स्थिती:
पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी सकाळी ७:०० वाजता २८ फूट ९ इंच नोंदवली गेली. पाणीपातळी वाढल्यामुळे पंचगंगा, कासारी, भोगावती, वेदगंगा आणि कुंभी नदीवरील एकूण १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
▪️पाण्यात गेलेल्या प्रमुख बंधाऱ्यांमध्ये शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ (पंचगंगा नदी), यवलूज, पुनाळ तिरपन (कासारी नदी), सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी (भोगावती नदी), निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे (वेदगंगा नदी) आणि शेणवडे, कळे, सांगरुळ (कुंभी नदी) यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.