कोल्हापूर : शहरात सुरु असणाऱ्या गॅस कंपन्यांच्या मनमानी कारभाराविषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे गॅस कंपन्यांची मनमानी थांबवून, ओटीपी शिवाय गॅस मिळालाच पाहिजे याबाबत निवेदन सादर केले.
घरगुती गॅस ही जीवनावश्यक बाब आहे. शहरात गॅस उपभोक्ता मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी घरगुती गॅस सिलेंडर मिळणे हे जिकरीचे होते. मात्र नरेंद्र मोदी सरकारने गॅस वितरणात मूलभूत बदल केल्यामुळे आता घरपोच गॅस मिळतो. याशिवाय राज्य शासनाने घरगुती गॅस साठी योजना देखील जाहीर केल्या आहेत. यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी ग्राहकाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतात. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला मोठा आर्थिक आधार मिळाला असून गॅस साठीचा त्रास संपला आहे.
मात्र गॅस कंपन्यांनी आपल्या मनमानी कारभार सुरू केला आहे. पैसे भरून नोंदवलेला गॅस ओटीपी नाही म्हणून ग्राहकांना दिलेला नाही. अनेक वेळा ज्या मोबाईलवर ओटीपी येतो तो मोबाईल अनेकवेळा घरातील कर्त्या पुरुषाचा असल्यामुळे तो नोकरी व्यवसायासाठी बाहेर असतो. अत्यावश्यक सेवेतील सिलेंडर ओटीपी शिवाय दिले जाऊ शकत नाहीत हा कोणता न्याय ? ज्येष्ठ नागरिक तसेच काही महिलांना अत्याधुनिक मोबाईल हाताळता येत नाहीत. त्यामुळे त्यांनाही ओटीपी आलेला समजत नाही व तो सांगता येत नाही. ओटीपी नाही म्हणून पैसे भरून नोंदवायला गॅस ग्राहकांना न मिळणे हे एका अर्थाने कायद्याचे उल्लंघन आहे. यामुळे गॅस वितरक व ग्राहक यात विनाकारण वादाचे प्रसंग उदभवत आहेत.
याबाबत केंद्र किंवा राज्य सरकारचा कोणताही आदेश नाही. गॅस कंपन्या केवळ आपल्या सोयीसाठी ग्राहकांवर ओटीपी लादत आहेत. याबाबत राज्यातील गॅस वितरण कंपन्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून OTP रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ ओटीपीची अट रद्द करून नोंदणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला वेळेत सिलेंडर मिळावा अन्यथा याविषयात तीव्र आंदोलन करावे लागेल.