बँकिंग क्षेत्रामध्ये ग्राहकांचे महत्व प्रचंड : शरद गांगल
schedule04 Jul 25 person by visibility 171 categoryउद्योग

कोल्हापूर : बँकिंग क्षेत्रामध्ये ग्राहकांचे महत्व प्रचंड आहे. त्याला जे पाहिजे तशा प्रकारची सेवा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ठाणे जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरद गांगल यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र व कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या सीईओज्/एमडीज् यांच्यासाठी आयोजित मॅनेजमेंट डेव्हल्पमेंट प्रोग्राम अंतर्गत स्टॅ्रटेजिक मॅनेजमेंट फॉर युसीबी् या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या गणित अधिविभागामधील सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी टीजेएसबी बँकेचे चेअरमन गांगल तज्ज्ञ म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन उपस्थित होते.
शरद गांगल म्हणाले, सहकारी बँकांमध्ये मनुष्यबळाचे महत्व आणि उपयोगिता मोठया प्रमाणात वाढलेली आहे. स्टॅ्रटेजिक मॅनेजमेंटमध्ये पुढच्या पाच वर्षांचा आराखडा तयार असणे आवश्यक असते. सहकारी बँकांचे फक्त फायनानशियल ऑडिट होत नाही तर त्यांचे सोशल ऑडीटही होत असते. त्यामुळे आपल्याला फार काळजीपूर्वक रहावे लागते. कर्मचारी वर्गाच्या योगदानामुळे बँकिंग सेवेचा विस्तार होत असतो. त्यामुळे कर्तबगार आणि कर्तुत्ववान कार्मचारी बँकांबरोबर राहण्यासाठी सातत्याने प्रोत्साहनपर नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत. सरकारी आणि शेडयुल्ड बँकेच्या ग्रोथ रेशोच्या आवाहनात्मक परिस्थितीपुढे सहकारी बँकांचे सी.डी.रेशो नेहमी योग्य प्रमाणात ठेवत असतानाच खर्च कमी ठेवण्यावरही भर असला पाहिजे. आज रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कमी केल्यामुळे पुढील चार-पाच वर्षांमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. फक्त ग्रोथच्या मागे न लागता बँकेची स्ट्रेंथ वाढीसाठीही प्रयत्न झाले पाहिजे. बँकाचे प्रॉफीट आणि रिझर्व्ह फंड हे आपल्या जमेची बाजू आहे. फिनटेक कंपनींबरोबर स्पर्धा न करता त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी शोधली पाहिजे. अंब्रेला ऑर्गनायझेशनमध्ये जास्तीजास्त सदस्यांनी सहभाग नोंदविला पाहिजे. आपण जर एकत्रित राहिलो नाही तर कुठलीही रेग्युलेटरी आपल्याकडे गांभीर्याने पाहणार नाही. ग्राहक सेवा देताना बँकांमधील कामकाज जास्तीत जास्त तंत्रज्ञानस्नेही करण्याकडे कल असला पाहिजे. सहकारी बँकामधील सेवकांना सर्व प्रकारच्या कामाची माहिती असते. कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षणाची आवश्यकता असते ते पूर्ण केले पाहिजे. सहकारी बँका रिलेशनशीप मॅनेजमेंटवर टिकून आहेत. यासाठी त्या ठिकाणचा सेवकवर्ग दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे.
ग्राहकांच्या प्रस्तावांची निर्गत वेळेत आणि तात्काळ निर्णय घेवून केले पाहिजे. बँकेच्या अध्यक्षांनी वारंवार किंवा रोजच बँकेकडे जाणे आवश्यक नाही. सीईओंवर जबाबदारी टाकली पाहिजे. त्याचबरोबर, दोन टर्मची मर्यादा असल्यामुळे पुढचे संचालक कोण असतील याचाही विचार करून ठेवणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन म्हणाले, बँकिंग क्षेत्रामध्ये अलिकडच्या काळात मोठया प्रमाणात होणारे बदल डिजीटल तंत्रज्ञानाची क्रांती आणि वाढलेली स्पर्धा यामुळे रणनिती व्यवस्थापनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. सहकारी बँकांनी पूर्णव्यावसायिकता जोपासून जनरेशन झेड मधूनही येणा-या ग्राहकांच्या अपेक्षापूर्तीला उतरणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि समाजातील बँकांसारखे घटक यांना जोडण्याचा प्रयत्न शिवाजी विद्यापीठ करीत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.कोल्हापूर येथील सीईओ अनिल नागराळे यांनी केले तर स्वागत गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ.राजन पडवळ यांनी केले. यावेळी अधिसभा सदस्य संजय परमणे यांचेसह ऐंशीहून अधिक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे सीईओ/एमडी उपस्थित होते.