मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. मात्र आश्चर्य म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यक मते नसतानाही ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या संबंधाच्या जोरावर विजय मिळवला. काँग्रेसचे सात ते आठ मते फुटल्याचे निकालातून समोर येत आहे.
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आज, शुक्रवारी मतदान झाले तसेच मतमोजणी देखील पार पडली. विधानसभेच्या २८८पैकी २७४ सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले. अंतिम निकालानुसार भाजपचे परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले.
ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सर्वपक्षीय संबंधाच्या जोरावर आमदार बनले. काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांनीही विजय संपादन केला. मात्र काँग्रेस आमदारांची ७ ते ८ मते फुटल्याची चर्चा आहे.