रखरखत्या उन्हात अर्थात उन्हाळ्यात रानावनात येणाऱ्या रानमेव्याची लज्जत वेगळीच असते. फळांचा राजा आंबा, काजू, फणस,या कोकणी फळांचा हा मोसम असलातरी रानावनात दऱ्याखोऱ्यांत पिकणाऱ्या कैरी,हिरडा,आवळा, जांभूळ, करवंदे, नेरले, यांसारख्या नैसर्गिक रानमेव्याची गोडी काही औरच असते.
सध्या काळी काळी मैना डोंगरची मैना म्हणजेच करवंदे बाजारात दिसू लागली आहेत. रखरखत्या उन्हात करवंदांचा आस्वाद घेण्यासाठी अबालवृद्ध नेहमीच हौसेने आघाडीवर असतात.शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड, आंबा यांसह सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जाळीदार हिरव्या गर्द झाडीत हा रानमेवा हमखास पाहायला मिळतो. सह्याद्रीच्या डोंगर कपारीत करवंदाच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यंदाच्या मोसमात करवंदाच्या जाळ्या बहरल्या आहेत, हिरवी कच्ची व पिकलेली काळी करवंदांनी यंदाचा मोसम बहरला आहे. काट्याकुट्याची पर्वा न करता करवंदाच्या जाळ्यात शिरून टोपली टोपली भरून करवंदे काढण्यात वाड्यावस्त्यांतील महिला व मुले व्यस्त असताना दिसत आहेत.करवंदाची जाळी संपूर्ण काटेरी असते. या काट्यांतून करवंदे तोडणे मोठे जिकिरीचे व कष्टाचे काम असते.पिकलेली करवंदे एक एक करून काढून टोपलीत ठेवणे हे काम तसे तापदायक असते. सकाळी सकाळी डोंगरदऱ्यात जाऊन हे काम करावे लागते.शिवाय ही तोडलेली करवंदे बाजारात, एसटी स्टँडवर जाऊन फिरून विकावी लागतात. पिंपळाच्या किंवा वडाच्या पानांचे द्रोण तयार करून दहा रुपये प्रमाणे ती विकली जातात.काळ्या व गोड करवंदांना बाजारात जादा मागणी आहे, सालाबादप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात डोंगरची मैना काळी काळी मैना अर्थात करवंदे विकत घेण्यासाठी व तीची आंबटगोड चव चाखण्यासाठी अबालवृद्ध मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. एखाद्या तुरट, किंवा आंबट तसेच एखाद्या अगदीच गोड अशा संमिश्र चवीची करवंदे खायला सर्वांनाच आवडते, त्यामुळे पावसाच्या आधी बाजारात दाखल होणारी करवंदे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते आहे.यंदा बाजारात करवंदाची आवक कमी असल्याने एका किलोसाठी सत्तर ते नव्वद रुपये दर आकारला जात आहे.एक टोपली ३५० ते ४०० रुपयांपर्यंत विकली जात आहे.
अतीउष्णता, पर्जन्यमान कमी तसेच वणवे लागत असल्याने करवंदाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे,असे मत इथल्या धनगर बांधवांनी व्यक्त केले. मे महिन्यात सुट्टी असल्याने वाड्यावस्त्यांतील शालेय विद्यार्थी सुध्दा करवंदे विकून वह्या पुस्तके व शैक्षणिक इतर खर्चासाठी करवंदे विक्री करून अर्थार्जन करतांना दिसतात. डोंगर कपारीत मिळणारी ही काळी मैना म्हणजे रानावनात राहणाऱ्या शेतकरी व धनगर यांसारख्या समाजाला आपल्या कुटुंबाला रोजीरोटी देणारी देवता आहे, असे कृतज्ञतापूर्वक मत व्यक्त करतात.
आयुर्वेदामध्ये मौल्यवान मानला जाणारा हा रानमेवा वनौषधी म्हणून खूपच महत्त्वाचा व आवश्यक आहे, मात्र जंगलात किंवा डोंगरदऱ्यात वणवा लागला की, ही अमूल्य संपत्ती नष्ट होते, त्यामुळे वनौषधी म्हणून महत्त्व असलेल्या हा रानमेवा जतन करणे तसेच त्यापासून वनौषधी प्रक्रिया करणे याकरिता उद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. ग्रामीण व डोंगरी भागात राहणाऱ्या शेतकरी व ग्रामीण जनतेला हक्काचा रोजगार मिळवून देणाऱ्या या रानमेवाबाबत जनजागृती करणे,व त्या अनुषंगाने लघू उद्योग उभारण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
✍️डॉ . सुनीलकुमार सरनाईक.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)