कोल्हापूर : २०१४ साली खोटी स्वप्ने दाखवून जे चुकून सत्तेत आले, त्यांनी आजपर्यंत सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप करुन विश्वजीत कदम यांनी कोणी कितीही दौरे केले. कोल्हापुरात कितीही मुक्काम ठोकले. बाहेरचे कितीही लोकांची साथ घेतली तरी त्याचा येथे परिणाम होणार नाही, कारण कोल्हापूरचे उमेदवार आणि कोल्हापूरचा विजय हा कोल्हापूरची जनता ठरवते असा टोला माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम लगावला.
कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कसबा बावडा भाजी मंडईत येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
विश्वजीत कदम म्हणाले, मला आवर्जून सांगायचंय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जेव्हा ही निवडणूक आपल्या कोल्हापूरच्या विकासासाठी जनतेसाठी लढतात ते हा केवळ कोल्हापूरचा मान नाही हा संपूर्ण महाराष्ट्राचा बहुमान आहे
कदम म्हणाले, बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ही निवडणूक लढली जात आहे. दिवस-रात्र ते प्रयत्न करतात कुठली कसर सोडली नाही. म्हणूनच आता भाजपला सुद्धा लक्षात आलंय की बंटी पाटलाला थोडसं जर त्यांच्या स्पीडला गतिरोधक आणायचा असेल तर त्यांना देशाचा पंतप्रधान इथे आणावा लागतो. पण आता पंतप्रधान सुध्दा रोखू शकत नाही. म्हणून हे मतदानाच्या दिवशी आपल्याला सिद्ध करून दाखवाये आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, गेल्या पंधरा दिवसांमध्ये अनेकांनी मला लक्ष्य केले. कोंडीत पकडण्याचे काम केले. मानसिक त्रास दिला. पण बंटी पाटील बावड्याचा आहे. घाबरणारा नाही. मी समोरून वार करण्याची भूमिका घेतली. पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. आज मी जो काही सगळ्या अडचणींवर समर्थपणे लढतो त्याला कारण म्हणजे माझं कसबा बावडा गाव माझ्या पाठीशी आहे.
यावेळी शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, भारती पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.