शिवाजी विद्यापीठात एनर्जी स्वराज यात्रेचे स्वागत
schedule17 Nov 25 person by visibility 54 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे 'सोलर मॅन ऑफ इंडिया' या नावाने ओळखले जाणारे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. चेतन सिंग सोळंकी यांच्या 'एनर्जी स्वराज' यात्रेचे स्वागत करण्यात आले.
डॉ. सोळंकी यांनी आपल्या आयआयटी, मुंबई येथील प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन आपले जीवन पूर्णपणे एनर्जी स्वराज यात्रेला समर्पित केले आहे. डॉ. सोळंकी यांनी खास सौर ऊर्जा बस तयार केली असून, सौरचलित विविध उपकरणे वापरुन तसेच ह्याच बसमध्ये राहून पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने स्वच्छ आणि नविकरणीय ऊर्जेचे महत्त्व पूर्ण भारत देशामध्ये प्रसार करीत आहेत. त्यांनी या यात्रेची सुरुवात २०२० मध्ये केली असून ते २०३० पर्यंत या यात्रेमध्ये सहभागी होऊन घरी न परतण्याचा निर्धार केलेला आहे. त्यांनी ५ वर्षात आतापर्यंत ६५,००० किलोमीटर एवढे अंतर पूर्ण केले आहे.
या यात्रेमधील सौर चलित बसचा अनुभव घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन, पदवी, पदव्युत्तर, तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
या उपक्रमात भौतिकशास्त्र अधिविभागासह इतर अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या एनर्जी स्वराज यात्रेचे भौतिकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रा. आर. जी. सोनकवडे, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. आर. एस. व्हटकर, संयोजक डॉ. एन. एल. तरवाळ, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. सी. बा. दास, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. एम. आर. वायकर, डॉ. एस. जे. शिंदे आणि संशोधक विद्यार्थी यांनी स्वागत केले. संयोजक डॉ. एन. एल. तरवाळ यांनी 'एनर्जी स्वराज' या संकल्पनेमागील भूमिका स्पष्ट केली आणि सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी सर्वांना आवाहन केले. विद्यापीठ प्रशासनानेही या यात्रेच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.