आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी, हिमाचल प्रदेश यांच्यात सामंजस्य करार
schedule18 Apr 25 person by visibility 236 categoryराज्य

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी मंडी हिमाचल प्रदेश या केंद्र शासनाच्या तंत्रज्ञान संस्थेसोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
या सामंजस्य करारावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयआयटी मंडी या संस्थेचे वित्त विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्वशील पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा हा बहुआपत्ती प्रवण जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जंगलात लागणारे वनवे अशा नैसर्गिक आपत्तींची प्रवनता आहे, तसेच रस्ते अपघात, औद्योगिक दुर्घटना, मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र येण्याची धार्मिक ठिकाणे आणि मानवनिर्मित आपत्तींचीही प्रवणता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या विषयातील नाविन्यपूर्ण योजना तसेच प्रकल्प राबवण्यामध्ये सातत्याने अग्रेसर आहे. समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनातील महिलांचा सहभाग, आपत्कालीन परिस्थितीमधील व्यत्यय विरहित संदेश देवाण-घेवाण, आपत्कालीन परिस्थितीमध्ये बिनतारी संदेश यंत्रणेचा वापर अशा नाविन्यपूर्ण आणि अभिनव संकल्पना आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविल्या जात आहेत.
आयआयटी मंडी या केंद्र शासनाच्या तंत्रज्ञान विषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये डॉ. सत्वशील पोवार हा कोल्हापूरचा युवक अत्यंत महत्त्वाच्या अशा वित्त (finance) विभागाचा अधिष्ठाता पदावरती कार्यरत आहे. सत्वशील पोवार हे स्वतः कोल्हापूर जिल्ह्याचे किंबहुना कोल्हापूर शहराचे नागरिक आहेत त्याचबरोबर कोल्हापूर शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमध्ये आपत्ती प्रवणता कमी करण्यासाठी, त्याचबरोबर जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी, कशा पद्धतीने मदत आणि सहकार्य करू शकते या अनुषंगाने सविस्तर चर्चा जिल्हा प्रशासनासोबत केलेली होती.
भारतीय तंत्रज्ञान संस्थांचं केंद्र शासनामार्फत जी वर्गवारी आणि मानांकन केलं जातं या मानांकनामध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यामध्ये आयआयटी मंडी या संस्थेचा पूर्ण देशभरात आठवा क्रमांक लागतो, या संस्थेकडे अतिउच्च स्वरूपाचे प्रगत तंत्रज्ञान त्याचबरोबर तंत्रशुद्ध प्रशिक्षित असे मनुष्यबळ उपलब्ध आहे. यास्तव या संस्थेमार्फत संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांना शासकीय विभागांना तांत्रिक मदत करण्याचं काम केलं जातं. कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती प्रवणतेच्या विचार करून जिल्ह्याची आपत्ती प्रवणता कमी करणे जिल्ह्याच्या पूर तसेच भूस्खलन या आपत्तींचे सौम्मीकरण करणे आणि जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी आवश्यक असणारे तांत्रिक सहकार्य पुरविणे यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी मंडी या दोघांमध्ये सामंजस्य करार व्हावा अशी विनंती जिल्हा प्रशासनाला केलेली होती.
सामंजस्य करारासाठी बनविण्यात आलेला मसुदा जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर तसेच आयआयटी मंडी या दोन्हीही संस्थांच्या समन्वयाने आणि सल्ल्याने बनविण्यात आला होता. आज दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी या सामंजस्य करारातील सर्व घटकांवरती सविस्तर चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली आणि आज या सामंजस्य करारावर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि डॉ. सत्वशील पोवार, अधिष्ठाता, वित्त विभाग, आयआयटी मंडी या दोघांच्या सह्या होऊन हा सामंजस्य करार अमलात आला आहे.
जिल्हाधिकारी येडगे यांनी संस्थेकडून सद्यस्थितीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे त्या प्रकल्पामध्ये त्वरित तांत्रिक सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद केले. याचबरोबर जागतिक बँकेच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबविला जाणारा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प (एमआरडीपी) म्हणजेच महाराष्ट्र रेसिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यक्रमांतर्गत भूस्खलन सौमीकरण तसेच पुर सौमीकरण या घटकांसाठीही तांत्रिक सहकार्य आवश्यक आहे असे नमूद केले.