मान्सून काळात प्रशासनाने सज्ज राहावे; प्रशासनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचना
schedule06 Jun 26 person by visibility 146 categoryराज्य
◼️मान्सूनपूर्वच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर मध्ये आढावा बैठक संपन्न
जयसिंगपूर : मान्सूनपूर्वच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, महापूर आणि संभाव्य दुष्काळ या दोन्ही संकटांचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. निवारा केंद्रांमध्ये शौचालय, वीज, आरोग्य सुविधा, उद्घोषणा प्रणाली आणि बॅरिकेड्सची व्यवस्था करावे, पूरकाळात ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, बिट अंमलदार व संबंधित अधिकारी यांनी गाव न सोडता बचावकार्याला प्राधान्य द्यावे. धोकादायक ठिकाणी कोणालाही प्रवेश देऊ नये, जीवितहानी टाळण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी, जनावरांच्या छावण्या, चारा व औषध पुरवठ्याचे नियोजन करण्याबरोबरच महापुरानंतर पंचनामे तत्काळ व अचूक करण्याची तयारी ठेवावी, सर्व विभागांनी सामूहिक जबाबदारीने कार्य करावे अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यांनी दिल्या. तसेच गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनातील प्रभावी समन्वयामुळे महापुराची तीव्रता कमी ठेवण्यात यश आले आहे. यंदाही दोन्ही राज्यांतील यंत्रणांमध्ये समन्वय राखून महापूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.
जयसिंगपूर येथील स्व.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली, या बैठकीत आमदार यड्रावकर बोलत होते.
यावेळी सर्व विभागांना सूचना देऊन पूरकाळात तत्परतेने आणि कर्तव्यनिष्ठपणाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. महापुराच्या काळात बचावकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या जवानांच्या योगदानाचे कौतुक केले. अशा पथकांना आवश्यक ते सहकार्य व मानधन वेळेत मिळावे, यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले. महापुरानंतर नुकसानग्रस्तांचे पंचनामे तातडीने आणि अचूक व्हावेत यासाठी कृषी विभागाने पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच मागील पूरस्थितीत काही व्यापारी, दुकानदार आणि गाळेधारक नुकसानभरपाईपासून वंचित राहिल्याच्या घटनांचा उल्लेख करत, यापुढे कोणताही पात्र नागरिक शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. पूरकाळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी साखर कारखाने आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
महापूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रशासनातील समन्वय गेल्या काही वर्षांत अधिक प्रभावी झाल्याचे सांगत त्यांनी दोन्ही राज्यांच्या यंत्रणांमध्ये माहितीची देवाणघेवाण आणि नियोजन सातत्याने सुरू ठेवण्यावर भर दिला. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास सर्व विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी सामूहिक प्रयत्नातून परिस्थितीवर मात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसिलदार तहसिलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे, आरोग्य अधिकारी पांडूरंग खटावकर, कुरुंदवाडचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके, बीएसएनएल विभागाचे अधिकारी केरीपाळे, पटबंधारे विभागाची दयानंद बगली, तालुका पशुसंवर्धन अधिकारी एस. पी. सोनवणे, आगार प्रमुख आसमा सय्यद यांनी शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर केलेली तयारी, आपत्ती व्यवस्थापन, निवारा केंद्र, पाण्याची सोय, वाहतुकीची सोय यासह पूर्व परिस्थिती या काळात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, प्रशांत शहापुरे, सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, सदस्या सीमा म्हैशाळे, फैजअली पटेल, बाबासो वनकोरे, कुमार माणकापुरे, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष माने, जयसिंगपूर चे पोलिस निरीक्षक संतोष गोरे, शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी टीना गवळी, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, अक्षय आलासे, वजीर रेस्क्यू फोर्स चे रऊफ पटेल सर्व गावचे सरपंच, पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.