विकसित भारतासाठी समर्पित मोदी सरकार, गेल्या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सर्व स्तरावर यशस्वी : खासदार धनंजय महाडिक
schedule16 Jun 25 person by visibility 240 categoryदेश

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. सेवा हा संकल्प मानून, माननीय पंतप्रधानांनी सुशासन ही संस्कृती मानली आणि देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळेच नवा विकसित आणि कणखर भारत उदयास येत आहे.एकूणच सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणून, मोदी सरकारने करोडो भारतीयांचे मन आणि हृदय जिंकले आहे. अशी भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार बैठकीत मांडली.
भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार बैठकीमध्ये खासदार धनंजय महाडिक म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करणाऱ्या योजना राबवल्या. तसेच देशाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमा आणि अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच नव तंत्रज्ञानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवले. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील एक लोकप्रिय, सक्षम आणि कणखर नेतृत्व म्हणून सर्वमान्य झाले आहेत. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा योजना यशस्वी केल्या, तर सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास ही संकल्पना गेल्या ११ वर्षात कृतीत आली. मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जनतेशी संवाद साधत आहेत. कधी नव्हे ते प्रत्येक भारतीयाला आपल्या पंतप्रधानांबद्दल जगभरातून मिळणारा आदर सन्मान दिसत आहे. गेल्या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांचा विश्वास मिळवत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी गतीमान वाटचाल सुरू केली आहे.
१. ऑपरेशन सिंदूरमधून भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. हिंसाचाराला किंवा दहशतवादाला घरात घुसून उत्तर दिले जाईल, हे मोदी सरकारने दाखवून दिले.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे, की दहशतवाद आणि व्यापार एकत्र राहू शकत नाही. रक्त आणि पाणी एकावेळी वाहू शकत नाही. भारतीय भूमीवर केलेला कोणताही हल्ला, युध्द मानून त्याला त्याच पध्दतीने उत्तर दिले जाईल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दिला आहे.
३. क्षेपणास्त्र रक्षण करणारी एस-४०० प्रणाली, तसेच ब्रम्होस, आकाश क्षेपणास्त्रे, आयएनएस विक्रांत, तेजस यासारखी हेलिकॉप्टर भारतात बनवून, भारत हा संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर झाल्याचे जगाला दाखवून दिले. भारताची शस्त्रास्त्र निर्यात ३४ पटीने वाढून, २३ हजार ६२२ कोटीवर पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीचे हे फळ आहे.
४. युध्द, नैसर्गिक आपत्ती अशा संकटात सापडलेल्या हजारो विदेशातील भारतीय नागरिकांना, मोदी सरकारने सुखरूप मायदेशी आणले आहे. मोदी सरकार केवळ देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबध्द नसून, जगभरातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबध्द आहे, हे यातून सिध्द झाले. रशिया-युक्रेन युध्दादरम्यान ऑपरेशन गंगा, अफगाणिस्तानमध्ये ऑपरेशन देवीशक्ती, कोविड काळात बंदे भारत मिशन अशा मोहिमातून मोदी सरकारने लक्षावधी भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले आहे. रशिया-युक्रेन युध्दावेळी अन्य देशांच्या नागरीकांनीही भारतीय झेंडा हातात घेऊन स्वतःचा बचाव केला.
५. काही वर्षापूर्वी देशात ९६ जिल्हे नक्षलवादीग्रस्त होते. मात्र मोदी सरकारने सुरक्षा दलांना बळ देत आणि नक्षलग्रस्त भागाचा विकास करत, नक्षलवाद संपवण्यासाठी निर्णायक पाऊल टाकले आहे. मोदी सरकारच्या धोरणामुळे देशातील नक्षलवादी कारवायांच्या प्रमाणात ७० टक्के घट झाली आहे.
६. भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत असून, जगातील एकूण डिजिटल व्यवहारापैकी ४९ टक्के व्यवहार भारतात होतात. तर भारताची वस्तू आणि सेवा निर्यात, ८२५ अब्ज डॉलर पर्यंत पोहचली आहे. देशातील युपीआय व्यवहारांनी २४ लाख कोटीची मर्यादा गाठली असून, देशात ११६ कोटी मोबाईल वापरकर्ते आहेत. तर देशातील इंटरनेट वापरणाऱ्या यांची संख्या गेल्या १० वर्षात २५.५ कोटी वरून ९७ कोटी पर्यंत पोहचली आहे.
७. मोदी सरकारने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत, शासकीय कामकाजात पारदर्शकता आणली आहे. को-विन, युपीआय, आभा, डीजी लॉकर यासारखे डिजिटल प्लॅटफॉर्म कार्यक्षमतेचे प्रतिक ठरले आहेत.
८. मोदी सरकारने अनेक सरकारी योजनांचे लाभ डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले आहेत. गेल्या ११ वर्षात, डीबीटीद्वारे ४४ लाख कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे व्यवस्थेतील दलाल संपले आणि भ्रष्टाचार कमी झाला. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि युएनडीपी सारख्या जागतिक संस्थानीसुध्दा गरीबी निर्मुलनासाठी भारताने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. गेल्या ११ वर्षात देशातील जवळपास २५ कोटी लोक दारिद्रय रेषेवर आले. पंतप्रधान जनधन योजनेतून ५५.२२ कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली.
९. मोदी सरकारने व्यवसाय सुलभता हे तत्व प्रत्यक्षात आणले. त्यामुळे या क्षेत्राच्या जागतिक क्रमवारीत भारत १४२ व्या क्रमांकावरून ६३ व्या क्रमांकावर पोहचला आहे. व्यवसाय, उद्योग, सुलभतेमुळे भारतात २०२३-२४ मध्ये १.८० लाखाहून अधिक नव्या कंपन्या नोंद झाल्या. इमर्जन्सी क्रेडीट लाईन गॅरंटी योजनेद्वारे, सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा करत २.३९ लाख कोटी एवढी रक्कम, एनपीए होण्यापासून वाचवली. २०२४-२५ मध्ये ८२५ अब्ज डॉलर एवढी निर्यात करून, जागतिक पातळीवर नवा विक्रम प्रस्थापित केला.
१०. मध्यमवर्गीयांचे जीवन सुखकर बनवण्यासाठी मोदी सरकारने सतेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले. त्यामुळेच १२.७५ लाखाचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला.
११. २०२४ मध्ये चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाली. आता गगन यान मोहिमेच्या तयारीला भारत लागला आहे. संशोधक, वैज्ञानिकांना मोकळीक देऊन, सरकारकडून सर्वप्रकारचे सहाय्य केले जात असल्यामुळे, अंतराळातील मोहिमा यशस्वी होत आहेत.
१२ः रस्ते, पूल, बोगदे, विमानतळ, हवाई मार्ग, रेल्वे, बंदरे यासारख्या पायाभूत विकास क्षेत्रात मोदी सरकारने प्रचंड मोठी कामगिरी केली आहे. जगातील सर्वात उंचीच्या चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. तर तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिला व्हर्टीकल लिफ्ट समुद्री पूल तयार करण्यात आला. १११ जलमार्गाना राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात आले आहे दुसरीकडे गेल्या ५ वर्षात ३ हजार ६०० किलोमीटर लांबीचे हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्यात आले.
१३. मोदी सरकारने ९९ टक्के खेड्यांना रस्त्याद्वारे जोडण्याचे काम केले आहे. देशात दररोज ३४ किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधले जात आहेत. रेल्वेसाठी अर्थसंकल्पातील तरतुद ९ पटीने वाढवली. देशात १३६ वंदे भारत रेल्वे सुरु झाल्या असून, १०३ रेल्वे स्थानकांचे पुनर्निमाण केले जात आहे. उड़ान योजनेअंतर्गत, देशातील विमानतळांची संख्या दुपटीने वाढून, ती १६० वर गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करणे शक्य झाले आहे.
१४. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शेतीसाठी ५ पटीने तरतुद वाढवण्यात आली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, ११ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ३.७ लाख कोटी रुपये देण्यात आले. पंतप्रधान पीक विमा योजनेत आतापर्यंत १.७५ लाख कोटीहून अधिक रकमेची विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे१५. गरीब कल्याण अन्न योजनेत ८१ कोटी लोकांना दरमहा ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जाते. तर आवास योजनेअंतर्गत ४ कोटीहून अधिक घरे बांधली गेली आहेत. १५ कोटीपेक्षा अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी दिले जात असून, १२ कोटी शौचालयं बांधली गेली आहेत.
१६. पंतप्रधान कृषि सिंचन योजनेद्वारे ९३ हजार कोटी रुपये खर्च करून ११२ सिंचन योजना सुरु करण्यात आल्या. ई-नाम योजनेद्वारे १ हजार ४७३ कृषि बाजार समित्या जोडल्या गेल्या. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळणे सोपे झाले. देशातील २५ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मृदा कार्डचे वाटप करण्यात आले.
१७. पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातही भारताने गेल्या ११ वर्षात लक्षणीय कामगिरी केली आहे. एक पेड, माँ के नाम या अभियानातून संपूर्ण देशात १४२ कोटीहून अधिक वृक्षारोपण झाले आहे. देशातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. २०२२ मध्ये देशातील वाघांची संख्या ३ हजार ६८२ पर्यंत गेली आहे.
१८. विकास भी विरासत भी, या सुत्रानुसार मोदी सरकारने काशी विश्वनाथ कॉरीडॉर, महाकाल परियोजना, राम मंदिराची निर्मिती केली आहे. डॉ. आंबेडकरांशी संबंधीत ५ ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास केला. राष्ट्रीय युध्द स्मारक तयार करून, देशासाठी हुतात्मा झालेल्यांना अभिवादन करण्यात आले.
१९. नारीशक्ती वंदन अभिनियमाद्वारे, लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले. तिहेरी तलाकची अमानुष प्रथा संपुष्टात आणून, मुस्लीम महिलांना मोठा दिलासा दिला आहे. महिलांना बाळतपणाची रजा २६ आठवडे करण्यात आली. तर ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशातील ३५.३८ कोटी महिलांना १४.७२ लाख कोटी एवढे कर्ज, मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात आले आहे. पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेअंतर्गत ३.९८ कोटी गर्भवती महिलांना, १८ हजार ५९३ कोटी रूपये अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
२०. महिलांना आता सैनिकी शाळांमध्ये आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश देण्यात येतो. आता प्रथमच एलओसीवर महिला सैनिक देशाच्या रक्षणासाठी उभ्या आहेत. शिवाय मोठ्या संख्येने महिला पायलट तयार होत आहेत.
२१. देशातील आयुर्विज्ञान संस्थांची (एम्स) संख्या वाढून, आता २३ वर गेली आहे. व्यवस्थापन शिक्षण संस्थांची संख्या वाढली आहे. ८ नव्या आयआयएम सुरू झाल्या असून, ७ नव्या आयआयटी सुरु झाल्या आहेत. देशात ४९० नव्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली असून, कौशल्यविकास योजनेअंतर्गत १.६ कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
२२. देशात १.६ लाखापेक्षा अधिक स्टार्टअप सुरू झाले असून, त्यातून १७.६ लाखापेक्षा अधिक नोकऱ्या तयार झाल्या आहेत.
२३. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ४०.७१ कोटी आरोग्य विमा कार्ड देण्यात आले. त्यापैकी ९ कोटीहून अधिक लोकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.
२४. १७ हजार ७५० पेक्षा अधिक ग्रामीण आरोग्य केंद्र सुरु करण्यात आली असून, दुर्गम भागातही तत्पर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळत आहे.
२५. ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर मोदी सरकारने लक्ष दिले आहे. या राज्यांमध्ये रेल्वे, रस्ते, विमानतळ, पूल अशा पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतुद केली आहे. ईशान्येकडील राज्यांसाठी मोदी सरकारने ३ हजार ६१३ विकास योजनांना मंजूरी दिली आहे. गेल्या ११ वर्षात १० ग्रीनफिल्ड विमानतळांची निर्मिती तयार करण्यात आली असून, आसाम मध्ये १५ नव्या रुग्णालयांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. त्यापैकी ८ रुग्णालये सुरु झाली आहेत.
२६. काश्मिरमधील ३७० वे कलम रद्द झाल्यामुळे देशाची अखंडता बळकट झाली आहे.
एकूणच सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणून, मोदी सरकारने करोडो भारतीयांचे मन आणि हृदय जिंकले आहे.
पत्रकार बैठकीस आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील,महेश जाधव, भगवान काटे, राजवर्धन निंबाळकर उपस्थित होते.