देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्याची सीमावासियांना मोठी अपेक्षा...
schedule22 Jun 25 person by visibility 184 category

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकारी समितीचे अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या निमित्ताने...
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ प्रलंबित महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत चर्चा करून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असलेल्या उच्चाधिकारी समितीची राज्य सरकारने नुकतीच पुनर्रचना केली आहे, या उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. समितीच्या पुनर्रचनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या निर्णयामुळे सीमावासियांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सीमाप्रश्न सोडविण्याची फार मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" ही आपली भविष्यवाणी खरी करून दाखवली आहे. अत्यंत कौशल्याने व चाणाक्षपणे प्रचंड सहनशीलता ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी ते दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन खमक्या पक्षात ऊभी फूट पाडून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे खमके नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही त्यांनी आपल्या सोबत आणले आहे. ही नव्या दमाची फौज आपल्या सैन्यात डेरदाखल करून आपले निर्विवाद नेतृत्व सिद्ध केले आहे. यांत प्रकर्षाने त्यांच्या चाणक्य नीतीचा प्रत्यय आला आहे.
त्यामुळे फडणवीस-शिंदे-पवार या सरकारबद्दल आपल्या कार्यातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर सीमाभागातील मराठी जनतेचेही भले होईल अशी अपेक्षा केली तर ती अनाठायी होणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीत व संस्कृतीत वाढलेले भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत व निष्कलंक चारित्र्याचे म्हणून नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रिय असलेले देवेंद्र फडणवीस हे शांत, संयमी पण योग्य प्रश्नांसाठी योग्यवेळी आक्रमक होणारे, ठाम भूमिका घेणारे असे नेतृत्व आहे, हे एव्हाना सिध्द झाले आहे. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ते निश्चितच योग्य व कठोर भूमिका घेतील असा ठाम विश्वास महाराष्ट्रातील जनतेला वाटत आहे. राज्यातील शेतकरी व कामगारांच्या हितासाठी झटतानाच सीमाभागातील मराठी माणसांच्या हितासाठीही ते कटीबद्ध आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकारी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे फडणवीस यांच्या हातात दिली आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीमाप्रश्नांसाठी प्राणपणाने लढतील, अशी खात्री वाटत आहे.
महाराष्ट्रापुढे जे प्रश्न उभे आहेत ते सर्व फडणवीस यांना ज्ञात आहेत. तसा त्यांचा दांडगा व्यासंग ही आहे आणि अनुभव ही आहे. नियतीने त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान केले आहे. सीमाप्रश्नांचे गेल्या ६५ वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. त्यांचा सोक्षमोक्ष लावून महाराष्ट्राच्या कक्षा विस्तारण्याच्या, महाराष्ट्राच्या नकाशाला सीमाभाग जोडण्यासाठीच्या प्रयत्नांची जबाबदारी त्यांच्यावर आणून सोडली आहे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तीव्र भावना आहेत. सीमाप्रश्नासारखी इतिहासातील घोडचूक सुधारण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यासारख्या योग्य नेतृत्वावर येऊन ठेपलेली आहे. ते आपली जबाबदारी मोठ्या हिमतीने व कौशल्याने पार पाडतील अशी आशा संपूर्ण महाराष्ट्राला आणि सीमाभागाला आहे. अर्थात फडणवीस सरकारच्या काळात सीमाप्रश्न सुटला तर हा एक नवा इतिहास घडणार आहे. हा महासत्तांतराचा काळ आहे. जे कधी घडेल असा स्वप्नातही कोणी विचार केला नसेल असे घडताना दिसते आहे. त्याचा लाभ इथल्या मातीला व्हायला पाहिजे अशी जनतेची सार्थ अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप शिवसेना युतीला कौल दिला असतांनाही उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बरोबर युती करून मुख्यमंत्री पद घेतले, व आपल्या मुलाला आदित्य ठाकरे यांना ही मंत्रीमंडळात संधी दिली, हे महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह बहुसंख्य आमदारांनी फुटून भाजपशी युती केली, बहुमताने भाजपा सरस असूनही अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली, फडणवीस यांनी नाईलाजाने का होईना पण हा निर्णय मान्य केला व आपला संयम सुटू दिला नाही. जेव्हा आपली वेळ आली, तेव्हा त्यांनी योग्य ती खेळी केली व सर्व अडचणींवर त्यांनी मात केली. त्यांनी सीमाप्रश्नाच्या बाबतीत कठोर भूमिका घेऊन 'नवा महाराष्ट्र' घडविला तर यावत्तचंद्र दिवाकरो महाराष्ट्राची मराठी जनता त्यांना कदापीही विसरणार नाही. यात तीळमात्र संदेह नाही,
✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशीचे संपादक आहेत.)