८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागर
schedule23 Jan 26 person by visibility 80 categoryराजकीय
शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात
कोल्हापूर : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास रचला आहे. १९८६ सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळाले न्हवते परंतु या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे १५ शिलेदार निवडून आले आहेत. आज शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जन्मशताब्दी जयंती असून, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सर्वांनी संकल्प करावा. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात मोलाचे योगदान द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त नगरसेवकांना दिल्या.
नूतन नगरसेवकांच्या विजयानंतर आता महापालिकेत अधिकृत गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने शिवालय शिवसेना जिल्हा कार्यालय शनिवार पेठ कोल्हापूर येथे शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करण्याच्या सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, निवडून आल्यानंतर केवळ पदाचा उपभोग न घेता, प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीला धावून जा. 'नगरसेवक' ही केवळ एक पदवी आहे, पण लोकांच्या मनात 'जनसेवक' म्हणून जागा मिळवणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे यश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हा मूळ मंत्र अमलात आणून प्रभागाचा कायापालट करण्यासाठी झटून काम करा. राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून उर्वरित काळ समाजाच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठीच ठेवा. मतदारांशी सतत संवाद ठेवा. निवडणुकीत ज्या विश्वासाने त्यांनी मतदान केले, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कायम उपलब्ध रहा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान उपस्थित होते.