विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबद्ध : ऋतुराज पाटील; डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत
schedule07 Sep 25 person by visibility 594 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : 41 वर्षाची उज्वल परंपरा असलेल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तम करिअरचा राजमार्ग निवडला आहे. विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले. महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात पाटील बोलत होते. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा ‘ओरिएन्टेशन’ समारंभ उत्साहात संपन्न झाला. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही मालदे, अॅडमिशन प्रमुख प्रा. रविंद्र बेन्नी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
ऋतुराज संजय पाटील यांनी डी. वाय. पाटील ग्रुपवर विश्वास दाखवणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये सुरु केलेले हे ग्रुपचे पहिले महविद्यालय असून आज ग्रुपचा महाराष्ट्रभर विस्तार आहे. एकाच नावाने ८ विद्यापीठे, १५ अभियांत्रिकी महाविद्यालये असलेला हा पहिलाच ग्रुप असावा. अनेक माजी विद्यार्थी आज देश विदेशात उच्च पदावर काम करतात याचा अभिमान वाटतो. आमच्या संस्थेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अमलबजावणी केली जाते. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व संस्थांशी सामजस्य करार करण्यात आले आहेत. उत्तम अभियंते घडवण्याबरोबरच चांगला नागरिक बनवण्यासाठी प्राध्यापक वर्ग मेहनत घेतात. त्यामुळे येथे प्रवेश घेतल्याने आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची खात्री झाली आहे. येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील अशी असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम, परीक्षा यांच्या नियोजनाची माहिती प्रेझेन्टेशनद्वारे दिली. ते म्हणाले, अभियांत्रिकी महविद्यालयाने उत्तम प्लेसमेंट रेकॉर्ड असून यावर्षी ५१५ हून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. आपल्या पाल्यावर चांगले पैलू पाडून चार वर्षानंतर किमती हिऱ्यात त्याचे रुपांतर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांची भूमिकाही महत्वपूर्ण असून त्यांनी सतत महाविद्यालयाच्या संपर्कात रहावे. विद्यार्थी- पालक आणि संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून उत्कृष्ट अभियंते बनण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया.
यावेळी सीएचआरओ श्रीलेखा साटम, कृषी व तंत्र विद्यापीठचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ. अजित पाटील, डॉ. अभिजित माने, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. नवनीत सांगळे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख प्राध्यापक आणि २ हजाराहून अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
प्रा. सुनंदा शिंदे व प्रा. राधिका ढणाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी आभार मानेल.