नाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
schedule23 Feb 26 person by visibility 94 categoryसामाजिक
कोल्हापूर : पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी सतत नाविन्याचा शोध घेतला पाहिजे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी व्यक्त केले.
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझमच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
डॉ. पंडित म्हणाले, पत्रकारितेचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे. कल्पकता आणि उपक्रमशीलता यातून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लोकोपयोगी पत्रकारिता करावी.
अध्यासनाच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. येत्या काही दिवसांत माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. दुपारनंतर मास कम्युनिकेशन आणि फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. साक्षी वाघमोडे हिने सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे, अनुप जत्राटकर, जयप्रकाश पाटील उपस्थित होते.