शासन आपल्या दारी अभियानांतर्गत मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन
schedule11 Jun 23 person by visibility 303 categoryराज्य
कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १३ जून रोजी तपोवन मैदान, कळंबा रोड येथे " पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे " आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं. कृ. माळी यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १७ पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे १८०० पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरिता कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान ८ वी ९ वी उत्तीर्णासह, १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावा. तपोवन मैदानावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना बायोडाटा ५ प्रतीत आणणे आवश्यक आहे. तसेच विभागाच्या वेबपार्टलवरील रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोकरी इच्छुक म्हणून नोंदणी (एम्पलॉयमेंट कार्ड) साठी सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. विविध कंपन्यांकडील रिक्तपदांसाठी उदयोजकांकडून मुलाखती घेऊन निवड करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे.