'शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा 'विठ्ठला'कडे धाव; पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून साकडे!
schedule18 Jul 26 person by visibility 213 categoryराज्य
कोल्हापूर : राज्यभरातून जोरदार विरोध होत असलेल्या प्रस्तावित 'नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गा'विरोधात १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी आता अधिकच आक्रमक झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पंढरपुरात येणार असल्याने, त्यांना हा शेतकरी विरोधी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मिळावी, या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी भर पावसात पंढरपुरात सद्बुद्धी दिंडी काढून नामदेव पायरी येथे विठ्ठलाला साकडं घातलं
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आज पंढरपुर येथे राज्यातील 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज एकवटले. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करा बा पांडुरंगा मुख्यमंत्र्यांना सुद्धबुद्धी दे अशा घोषणा देत वाखरी मैदान ते विठ्ठल मंदिर असा सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा प्रवास या दिंडीने केला. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा गजर आणि 'शक्तीपीठ महामार्ग रद्द करा' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पावसाची तमा न बाळगता हजारो शेतकरी या दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
दिंडी विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीवर पोहोचल्यानंतर, तिथे आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी येताना विठ्ठलाने हा विनाशकारी महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी, अशी साकडे या वेळी विठूरायाच्या चरणी घालण्यात आले.
शक्तीपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होणार असून, हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, असा दावा संघर्ष समितीने केला आहे. सरकार हा प्रकल्प रद्द करेपर्यंत लढा थांबणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनाने सरकारवर दबाव वाढवला आहे.