स्त्रीशक्तीच्या कौशल्यातून उद्योग उभारणी शक्य: कविता देसाई
schedule11 May 26 person by visibility 83 categoryउद्योग
कोल्हापूर : स्त्री शक्तीच्या कौशल्यातून उद्योग उभारणी शक्य असून त्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने राबविलेला कार्यशाळेचा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कविता देसाई यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे शुक्रवारी (दि. ८) ताराराणी चौक येथे एकदिवसीय "महिला उद्योजिका क्षमता विकास कार्यशाळा" पार पडली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कविता देसाई यांनी महिलांना उद्योग सुरु करण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महिलांच्या अंगी असलेली मेहनत, कौशल्य, आत्मविश्वास याला जर योग्य उद्योग उभारणीच्या मार्गदर्शनाची जोड लाभली तर महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनून स्वतःचा, कुटुंबाचा विकास साधू शकतील, असे त्या म्हणाल्या.
डॉ. सोनल विलास मंगल यांनी महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी तसेच समाजाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी उद्योजकीय क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी माया देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवन प्रवासाचा अल्प परिचय उपस्थितांना करून दिला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रीती बागी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी उद्योग म्हणजे काय, तो का करावा, कसा सुरु करावा यशस्वी होण्यासाठी आवश्यक गोष्टी इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रिया भूयेकर यांनी डिटर्जेंट बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यामध्ये नीळ, फिनाईल, लिक्विड सोप, वॉशिंग पावडर, साबण, पेपर सोप इत्यादी बनवण्याबाबत प्रात्यक्षिक स्वरुपात मार्गदर्शन केले.
शुभदा कामत, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या प्रकल्प अधिकारी डॉ. सोनल मंगल व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यशाळेचे नियोजन केले. विजाभज, इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यशाळेचा लाभ घेतला. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच अध्यासन समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांचे कार्यशाळेसाठी प्रोत्साहन लाभले.