समाजस्वास्थ्यासाठी वारकरी संप्रदायाचे योगदान अलौकिक : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
schedule11 May 26 person by visibility 108 categoryसामाजिक
◼️निढोरीत कोल्हापूर जिह्याच्या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक सद्गुरू बापू महाराज तळाशीकर यांच्या तैलचित्राचे अनावरण
निढोरी : वारकरी संप्रदाय भक्तीतून समता, बंधूता, प्रेम देत सात्विक समाज घडवत आहे. हा संप्रदाय अध्यात्मिक मार्गाबरोबरच समाजाला दिशा देणारा भक्कम सामाजिक आधार आहे.
समाजस्वास्थ्यासाठी वारकरी संप्रदायाचे योगदान अलौकिक आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
निढोरी ता. कागल येथे बापू महाराज- तळाशीकर ट्रस्ट, विनायक साधक आश्रम व श्री. रामनवमी सप्ताह मंडळ आयोजित "व्यक्तिमत्व विकास संस्कार शिबीर" सांगता व कोल्हापूर जिह्याचे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक सद्गुरू बापूमहाराज- तळाशीकर यांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमासाठी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुआप्पा देसाई, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शोभाताई फराकटे, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव- तळाशीकर, मधुकर जांभळे, मनोज फराकटे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुश्रीफ यावेळी पुढे म्हणाले, आम्ही आयुष्यभर पुरोगामी विचारानेच काम करत आलो आहे. अध्यात्म आणि वारकरी संप्रदायावर मनापासून प्रेम केले आहे. सद्गुरू बापू महाराज- तळाशीकर ट्रस्टच्या इमारतीलादेखील लवकरच भरीव निधी देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले
दलितमित्र एस.आर. बाईत म्हणाले, सध्या या समतावादी वारकरी संप्रदायावर विविध वैचारिक प्रहार होत आहेत. आमच्या आदर्श अशा विचारांची मोडतोड करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे लोक अस्वस्थ व चिंतेत आहेत. या संप्रदायाने समाजाचे शुद्धीकरण करून वारकरी संप्रदायाची गुणवत्ता वाढवली पाहिजे .
जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शोभाताई फराकटे म्हणाल्या, वारकरी संप्रदाय आणि नामदार मुश्रीफसाहेब यांचे ऋणाणूबंध मोठे आहेत. या संप्रदायातील कोणीही व्यक्ती त्यांच्याकडे गेल्यास ते कधीच रिकाम्या हाताने परतले नाहीत.
प्रारंभी सद्गुरु बापू महाराज- तळाशीकर यांच्या तैलचित्राचे अनावरण मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधूआप्पा देसाई, ह. भ. प. नारायण एकल, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, श्रीमती शोभाताई फराकटे, रामभाऊ खराडे, शिवाजीराव वाघवेकर, ह.भ.प. अरुण तोरस्कर यांच्यासह विद्यार्थीनी सई जोंधळे, विराज राजिगरे, श्रीराज सुतार, पालक रणजीत चौगले यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमास निढोरीच्या सरपंच शुभांगी सुतार, बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, माजी उपाध्यक्ष केशवकाका पाटील, माजी संचालक सुरेशआण्णा सुर्यवंशी, माजी उपसरपंच विठ्ठल पाटील, उद्योजक एकनाथ कमळकर, बोरवडेचे माजी सरपंच रघुनाथ कुंभार, अमित पाटील आदिसह वारकरी संप्रदायातील लोक, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
स्वागत व प्रास्ताविकामध्ये बापू महाराज- तळाशीकर ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प. उद्धव महाराज यांनी विनायक साधक आश्रमाच्या कामाचा आढावा घेतला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.