मतदार जनजागृतीसाठी यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, मानवी साखळी
schedule31 Dec 25 person by visibility 73 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या मतदार जनजागृती अभियानांतर्गत आज यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरातील गंगावेश स्टॅण्ड, रंकाळा वेस स्टॅण्ड तसेच रंकाळा परिसरात प्रभात फेरी काढून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
या प्रभात फेरीदरम्यान मतदान करा – लोकशाही बळकट करा, प्रत्येक मत महत्त्वाचे अशा घोषणा देत नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करण्यात आले. यानंतर रंकाळा वेस स्टॅण्ड येथे विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा संदेश दिला.
या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे मतदानाबाबत जनजागृती वाढीस लागली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यास निश्चितच मदत होणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने पुढील काळातही प्रभात फेरी, पथनाट्य, मानवी रांगोळी, मतदान शपथ, पोस्टर व जनसंवाद अशा विविध माध्यमांतून मतदार जनजागृतीचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
सदर मतदार जनजागृती अभियान कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी, उपआयुक्त किरण कुमार धनवाडे तसेच प्राचार्य बाबासो उलपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.





