डी के टी ई च्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकला एन.बी.ए.चे त्रैवार्षिक पुनर्मानांकन – गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शिक्कामोर्तब
schedule23 Jun 25 person by visibility 502 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकने अभियांत्रिकी शिक्षणातील गुणवत्ता सिद्ध करत नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन (NBA) कडून सर्व अभ्यासक्रमांसाठी पुन्हा एकदा तीन वर्षांसाठी मान्यता मिळवली आहे. ही मान्यता म्हणजे संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि दर्जेदार तंत्रशिक्षणातील सातत्यपूर्ण कार्यप्रदर्शनाची ठोस पावती आहे. ही मान्यता विद्यार्थ्यांसाठी उज्वल करिअरच्या दिशा उघडणारी असून, यामुळे संस्थेचे औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील स्थान अधिक बळकट होणार आहे.
“१९८२ पासून गुणवत्तेचा वारसा जपणाऱ्या डी के टी ई साठी हे पुनर्मानांकन म्हणजे आमच्या शिक्षणातील विश्वासार्हतेची राष्ट्रीय ओळख आहे. “डी के टी ई” ने तंत्रशिक्षणात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे. वाय. सी. पी. ला एन.बी.ए.चे पुनर्मानांकन मिळणे म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या वचनबद्धतेची अधिकृत पुष्टी आहे. सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या सर्व शाखांना एन.बी.ए.चे मानांकन मिळाले आहे. ही मान्यता मिळवण्यासाठी टिचिंग-लर्निंग प्रक्रिया, संशोधन, विद्यार्थ्यांचे यश, करिअर मार्गदर्शन, प्लेसमेंट, आधुनिक सुविधा, विभागीय दस्तावेजीकरण आणि आऊटकम बेस्ड एज्युकेशन यांचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले होते.
या “एन.बी.ए. पुनर्मानांकनामुळे पॉलिटेक्निकमधील तंत्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर राष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे खुली ठेवण्याचा आमचा संकल्प यामुळे अधिक बळकट झाला असून “एन.बी.ए." मानांकनामुळे आमच्या संस्थेच्या गुणवत्ता धोरणास बळ मिळाले असून हे यश संपूर्ण डी के टी ई परिवाराच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.” असे मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी नमूद केले.
या सर्व यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, प्राचार्य प्रा. अभिजीत कोथळी उपप्राचार्य व समन्वयक प्रा. बी.ए. टारे, संस्थेच्या संचालिका डॉ. एल.एस. आडमुठे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.