लक्ष्मीपुरीतील एस एस अग्रवाल अँड सन्स दुकानातून सहा हजार किलो प्लास्टिक जप्त
schedule23 Jun 25 person by visibility 318 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्ष्मीपुरी येथे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमे दरम्यान लक्ष्मीपुरीतील एस.एस.अग्रवाल अँड सन्स या दुकानाची तपासणी केली असता त्यांच्याकडे जवळपास अंदाजे ६००० किलो प्लॅस्टिकच्या वस्तू आढळून आल्या. महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहीमे अंतर्गत एस.एस.अग्रवाल अँड सन्सवर रुपये ५०००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लास्टिक बंदी कायद्याअंतर्गत या दुकानावर कारवाई करून २ ट्रॅक्टर भरून सिंगल यूज प्लास्टिक (एकल वापर प्लास्टिक बंदी) वस्तू आढळून आल्याने तेथील ३३ बॉक्स व ८ पोती इतका सिंगल यूज प्लास्टिक साठा या कारवाई वेळी जप्त करण्यात आला. हे सर्व प्लास्टिक जप्त करून महानगरपालिकेच्या कसबा बावडा घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथील प्लॅस्टिक श्रेडिंगद्वारे विल्हेवाट लावण्याकरिता पाठविण्यात आले आहे.
सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर समन्वयक हेमंत काशीद, मेघराज चडचणकर, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, शुभांगी पवार, विनोद कांबळे, सौरभ घावरी, मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली.
तरी शहरातील नागरीकांनी प्लास्टिक पिशव्या न वापरता पर्यायी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा, कागदी पिशव्यांचा वापर करावा. एकल प्लास्टिक पिशव्यांचा व वस्तूंचा अतिवापर आपल्या पर्यावरणासाठी एक मोठी समस्या बनली आहे. या पिशव्या जमिनीमध्ये लवकर कुजत नाहीत, त्यामुळे मातीचे प्रदूषण होते आणि गटर नाले मोठया प्रमाणात तुंबतात. त्यामुळे संपूर्ण शहराला प्लास्टिक पिशव्यांमुळे मोठा धोका निर्माण होत आहे. हे प्लास्टिक जाळल्यास विषारी वायू वातावरणात मिसळून हवेचेही प्रदूषित होते. त्यामुळे सर्व आस्थापनांनी आपल्या दुकानातून ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देण्याऐवजी कापडी पिशव्या, कागदी पिशव्या किंवा इतर पर्यावरणास अनुकूल पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन दिले, तर त्यामुळे खूप मोठा सकारात्मक बदल घडून येईल. सर्व व्यापा-यांनी ग्राहकांना स्वतःची पिशवी घेऊन येण्याची विनंती करावी अथवा नाममात्र शुल्कात पर्यावरणास अनुकूल पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात. या प्रयत्नांमुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, तर दुकानांची पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी देखील दिसून येईल.
तरी शहरातील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.