गांधीनगर भूमापन कार्यालयाचा 'रामभरोसे' कारभार; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
schedule04 May 26 person by visibility 108 categoryसामाजिक
गांधीनगर : येथील नगर भूमापन कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत करवीर तालुका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रशासनाला धारेवर धरले आहे. गांधीनगर सज्जामध्ये वळीवडे, चिंचवाड, सांगवडे यांसह ड्रोन सर्वेक्षणानंतर वाढलेल्या अतिरिक्त गावांच्या संख्येमुळे कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. असे असतानाही, आठवड्यातून केवळ दोन दिवस (मंगळवार व शुक्रवार) उघडणाऱ्या या कार्यालयात कर्मचारी मोजणीच्या नावाखाली बाहेर असतात. त्यामुळे लांबून येणाऱ्या वृद्ध आणि महिलांना कडक उन्हात रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या नावे उपअधीक्षक किरण माने यांना निवेदन दिले. "जर कर्मचाऱ्यांना कार्यालयात बसवून प्रलंबित कामे तात्काळ निकाली काढली नाहीत, तर कार्यालयाला कायमस्वरूपी कुलूप ठोकले जाईल," असा इशारा यावेळी देण्यात आला. यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत, निश्चित केलेल्या दोन्ही दिवशी अधिकारी उपस्थित राहतील आणि प्रलंबित कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले आहे.
यावेळी पोपट दांगट, राजू सांगावकर, योगेश लोहार यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.