शिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवाद
schedule03 Feb 26 person by visibility 138 categoryसामाजिक
कोल्हापूर : नुकत्याच सादर झालेल्या सन २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर शिवाजी विद्यापीठात काल (दि. २) विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातर्फे आयोजित या परिसंवादात अर्थसंकल्पाच्या विविध बाबींच्या अनुषंगाने चर्चा आणि प्रश्नोत्तरेही झाली.
परिसंवादात डॉ. आण्णासाहेब पाटील यांनी अर्थसंकल्पातील विविध तरतुदींबद्दल विस्तृत विवेचन केले. अर्थसंकल्पात ग्रामीण भारत, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्र यांच्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण, कौशल्य विकास व तंत्रज्ञान या बाबींच्या विकासासाठी तरतूद मुबलक असली तरी आणखी लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांबळे यांनी अर्थसंकल्पातील सामाजिक बाबींवर भाष्य केले. आर्थिक सर्वेक्षण, संवैधानिक तरतुदी आणि भारताची जागतिक अर्थव्यवस्थेमधील स्थिती या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातील तरतुदींचा त्यांना आढावा घेतला.
डॉ. केदार मारुलकर यांनी अर्थसंकल्पातील कर प्रस्ताव या विषयावर मांडणी केली. अर्थसंकल्पामधील प्राप्तीकरविषयक तरतुदी तसेच अर्थसंकल्पाचा शेअर बजारावर होणारा परिणाम याबद्दल विवेचन केले.
अध्यक्षस्थानावरून डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष तरतुदी यांचा आढावा घेतला. आर्थिक शिस्त आणि विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी यामुळे ‘विकसित भारत @ २०४७’कडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर हरीष कांबळे यांनी आभार मानले. परिसंवादासाठी एम. कॉम व एम.बी.ए.चे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.