इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : आ . राजेश क्षीरसागर
schedule27 Mar 26 person by visibility 120 categoryराज्य
कोल्हापूर : इराण,अमेरिका - इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे. तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल - डिझेल,गॅस) आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आ.राजेश क्षीरसागर यांनी केले .
जिल्ह्यात गॅस व पेट्रोल टंचाई संदर्भात विविध अफवा पसरलेल्या आहेत.त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली .
सध्या गॅस व पेट्रोल तसेच डिझेल टंचाईच्या अनुषंगाने नागरिक पॅनिक झाले आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिक गॅस सिलेंडरसाठी तळपत्या उन्हात तासंन तास उभे राहतात. त्यासाठी संबंधित गॅस एजन्सीने पिण्याचे पाणी तसेच या ग्राहकांसाठी सावलीची सोय करावी.यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना आदेश द्यावेत असे सांगून शहरी भागातील नागरिकांनाही रॉकेल देण्यासंदर्भात आपण लवकरच अन्न नागरी पुरवठा विभागाशी बोलणार असल्याचे क्षीरसागर यावेळी म्हणाले.
घरगुती गॅस साठा पुरेशा प्रमाणावर आहे तसेच जिल्ह्यात गॅस पुरवठ्याबाबत परिस्थिती नियंत्रणात आहे.कोल्हापूर शहर व जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नसल्याचे सांगून शाळा,हॉस्टेल,हॉस्पिटल या ठिकाणी प्राधान्याने गॅस पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी या बैठकीत दिली.
या बैठकीसाठी हर्षल सुर्वे ,शिवाजी जाधव, रणजीत जाधव, कमलाकर जगदाळे, दीपक चव्हाण , राजू भुरी , निलेश हंकारे ' दुर्गेश लिंगराज, रमेश खाडे,उदय भोसले , सुनील खोत, किशोर घाडगे, सुनील जाधव, सुरेश माने, अनिल पाटील ,धीरज मुळे, अर्जुन आंबी, पूजा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, मंगल कुलकर्णी प्रीती अतिग्रे यांच्यासह पेट्रोल - डिझेल, गॅस डिलर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते .