करवीर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! शिंगणापूर येथील १८.९७ लाखांची घरफोडी अवघ्या ४८ तासांत उघडकीस; गोव्याच्या कॅसिनोत उधळलेली सोन्याची दागिनं हस्तगत
schedule03 Sep 26 person by visibility 6 categoryगुन्हे
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील सूर्यनगरी परिसरात घडलेल्या एका खळबळजनक घरफोडीच्या गुन्ह्याचा करवीर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत यशस्वी छडा लावला आहे. तब्बल १८ लाख ९७ हजार ३५० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, खुद्द फिर्यादीचाच लहान भाऊ या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शिंगणापूर येथील सूर्यनगरी, हनुमंतवाडी रोडवरील फिर्यादी आतिश संजय चौगुले यांच्या राहत्या घरातून ऑक्टोबर २०२५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी ३० ऑगस्ट २०२६ रोजी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
चोरीला गेलेले आणि जप्त केलेले सोन्याचे दागिने (एकूण १३८ ग्रॅम, किंमत ₹ १८,९७,३५०):
* मंगळसूत्र - १ नग
* लक्ष्मीहार - १ नग
* अंगठ्या - ६ नग
* चेन - ४ नग
* कर्णफुले - १ जोड
* कानातील रिंगा साखळीसह - १ जोड
तपासादरम्यान संशयित म्हणून फिर्यादीचाच सख्खा भाऊ आदित्य संजय चौगुले (वय २१, रा. सूर्यनगरी, शिंगणापूर) याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला तो पोलिसांसमोर उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्ण व विश्वासाने कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, या चोरातील सोन्याचे दागिने विकून आलेले पैसे त्याने गोवा येथील कॅसिनोत जुगार खेळून उधळल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी शक्कल लढवून या गुन्ह्यातील सर्वच्या सर्व १८,९७,३५० रुपये किमतीचे १३८ ग्रॅम वजनाचे दागिने पंचनाम्यानुसार हस्तगत केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार करत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार, तसेच पोलीस अंमलदार विजय तळसकर, महेश बांबळे, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, प्रविण बोरचाटे, श्रीधर जाधव, सोमराज पाटील, अमोल चव्हाण आणि आत्माराम शिंदे यांच्या पथकाने पार पाडली आहे. पोलिसांच्या या जलद व धडाकेबाज कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.