कोल्हापुरात 'माझं शहर, माझी जबाबदारी' स्वच्छता अभियान यशस्वी; महापौर रूपाराणी निकम यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार
schedule28 Feb 26 person by visibility 123 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत' अभियानापासून प्रेरणा घेऊन कोल्हापूर शहरात राबवण्यात आलेले 'माझं शहर, माझी जबाबदारी' (भाग-१) हे स्वच्छता अभियान अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले. या अभियानाच्या यशस्वी पूर्ततेनंतर महापौर रूपा राणी निकम यांनी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचे आणि प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत. हे अभियान यशस्वी करण्यात प्रसारमाध्यमांनी अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक भूमिका बजावली असून, त्यांनी केलेल्या व्यापक प्रसिद्धीमुळेच हे अभियान जनचळवळ बनू शकले, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या स्वच्छता मोहिमेत कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था, बँका, रोटरी आणि लायन्स क्लब, तालीम मंडळे आणि समर्पित स्वच्छतादूतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन, आयुक्त , सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि विशेषतः शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून या कार्यात हातभार लावला. करवीर निवासिनी आई अंबाबाईचा आशीर्वाद लाभलेल्या या ऐतिहासिक शहरात जगभरातून पर्यटक येत असतात, त्यामुळे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राखणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक कोल्हापूरकराची नैतिक जबाबदारी असल्याचे महापौर रूपाराणी निकम यांनी स्पष्ट केले.
अभियानाचा समारोप करताना त्यांनी असा ठाम विश्वास व्यक्त केला की, भविष्यात कोल्हापूर शहर इतके स्वच्छ ठेवले जाईल की पुन्हा अशा प्रकारे विशेष मोहीम राबवण्याची गरजच पडणार नाही. स्वच्छतेचा हा वारसा यापुढेही निरंतर सुरू ठेवण्यासाठी कोल्हापूरवासीयांनी कायम असेच सहकार्य करावे, असे आवाहन केले.