पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा : आमदार यड्रावकर ; पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न
schedule25 Aug 26 person by visibility 187 categoryराज्य
शिरोळ : पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील प्रदूषण निर्मूलनासाठी उपाययोजनांबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आक्रमकपणे मांडला.
इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून प्रक्रिया केलेले दूषित पाणी थेट पंचगंगा नदीपात्रात मिसळत असून प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार यड्रावकर म्हणाले, इचलकरंजीतील प्रक्रिया उद्योगांचे दूषित पाणी काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळत असल्याने शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून या प्रश्नावर तालुक्यात आंदोलने सुरू आहेत. मात्र, आंदोलन झाल्यानंतर चार दिवस प्रक्रिया बंद केली जाते आणि त्यानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू करून दूषित पाणी काळ्या ओढ्याच्या माध्यमातून नदीत सोडले जाते. हे किती दिवस चालणार? प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई का होत नाही? असा सवाल त्यांनी बैठकीत उपस्थित केला.
पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे पाणी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीवरील एकही पाणीपुरवठा योजना सुरू नसल्याचे सांगत, प्रदूषणाचा मुद्दा हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केले.
प्रदूषण करणाऱ्या प्रक्रिया उद्योगधारकांनी दूषित पाणी शेतीमध्ये सोडण्यासाठी पर्यावरण विभागाकडे किती क्षेत्राचे प्रमाणपत्र सादर केले आहे आणि प्रत्यक्षात संबंधितांकडे किती शेतीचे क्षेत्र उपलब्ध आहे, याची खरी वस्तुस्थिती मंत्री महोदयांसमोर मांडावी असे सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया केलेले दूषित पाणी एकाही शेती क्षेत्रात गेलेले नसून ते थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा दावा त्यांनी केला. १५ जूनपासून आजअखेर काळ्या ओढ्याच्या माध्यमातून प्रदूषित पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगून लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवले पाहिजे. अशी मागणी केली.
दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना संबंधित भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. प्रक्रिया उद्योगांकडे प्रत्यक्षात किती शेतीचे क्षेत्र आहे, याची खात्री करावी तसेच काळ्या ओढ्यातून कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित पाणी पंचगंगा नदीपात्रात मिसळणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडीक तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.