सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर
schedule18 Jul 25 person by visibility 194 categoryराज्य

▪️अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन
मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता.वाळवा) शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येणार आहे. याबाबत अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची मागणी आहे. ईश्वरपूर नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली असून तसा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री भुजबळ म्हणाले, गाव, शहर यांचे नाव बदलविण्याचे अधिकार केंद्र शासनास आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) चे नाव ईश्वरपूर करणेबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह पाठवण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून या प्रस्तावात मान्यता मिळाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे नामांतर ईश्वरपूर करण्यात येईल, असेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
▪️सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे नामांतर "ईश्वरपूर" करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार : संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून "ईश्वरपूर" करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. जनभावना लक्षात घेता इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव "ईश्वरपूर" असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे निवेदन संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केले.
पाटील यांनी निवेदनात म्हटले की, गाव किंवा शहर यांचे नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून, याप्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करण्यात येत आहे. केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर "ईश्वरपूर" असे करण्यात येईल.