राधानगरी येथे पारावरचा फराळ : केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजनांचा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला आढावा
schedule30 Oct 25 person by visibility 93 categoryराजकीय
कोल्हापूर : देशाचं अर्थचक्र गतीमान करण्याचे आणि विकासाच्या सर्वंकष योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशात स्थिर सरकार असल्यामुळे, विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. भारत महासत्ता बनण्याकडे वेगाने पावले टाकतोय, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे झालेल्या पारावरचा फराळ कार्यक्रमात ते बोलत होते.
राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे भाजपच्यावतीने, पारावरचा फराळ आणि गावातील महिला आणि मुलांना कपडे वाटप असा कार्यक्रम झाला. विजय महाडिक यांच्या पुढाकारातून झालेल्या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार महाडिक यांच्या हस्ते महिलांना कपडे वाटप आणि फराळ वाटप करण्यात आले.
गावातील एका झाडाच्या पारावर झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार महाडिक यांनी, देशाच्या विकासाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश सर्व क्षेत्रात वेगानं प्रगती करतोय. जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना अशा योजनांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल झालाय, असे खासदार महाडिक म्हणाले. आता दिवाळीचे फटाके संपले असले तरी लवकरच राजकीय फटाके वाजण्यास सुरुवात होईल, असे सांगून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महायुतीला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, विजय महाडिक, संभाजी आरडे, लहु जरग, मानसिंग पाटील, अशोक मोरे, रवीश पाटील, राजाराम मोरे, शेखर पाटील, स्वप्निल जरग, दत्तात्रय निल्ले, गोविंदराव चौगले, डॉ सुभाष जाधव, कृष्णात आरबूने, शौकत बक्षु, दीपक शिरगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.