ऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे मदतीचा प्रस्ताव सादर करावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
schedule30 Oct 25 person by visibility 72 categoryराज्य
मुंबई : राज्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक मदतीचा प्रस्ताव सहकार विभागाने सादर करावा, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
विधानभवनात उसतोड कामगारांच्या कल्याणार्थ प्रस्तावित चर्चा व पुढील दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अपर विभागीय आयुक्त कोकण सिद्धराम सालीमठ, उपसचिव अंकुश शिंगाडे, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र गोरणे, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुण्याचे उपसंचालक डॉ. आशिष भारती उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगार हे राज्याच्या साखर उद्योगाचे कणा आहेत. अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान होत असून, त्यांच्या अडचणींचा विचार करून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे गमबूट, इलेक्ट्रिक कोयता, सॅनिटरी नॅपकिन, ग्ल्वोहज या आवश्यक गोष्टी वेळेत मिळण्यासाठी डीबीटीद्वारे मदत देणे सुलभ होईल. त्याचसोबत फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था ग्रामीण विकास विभागामार्फत व संबंधित विभागामार्फत करण्याच्या न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी गरजेची आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ऊसतोड कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आठवड्यातून फिरता दवाखाना व महिला कामगारांसाठी स्त्री रोग तज्ज्ञांची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच महिला ऊसतोड कामगारांसाठी प्रसूती रजा मातृत्व योजनेचा लाभ देण्याबाबतही विचार करण्यात यावा, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
पुढील बैठकीत ऊसतोड कामगारांच्या कल्याणार्थ चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, धाराशिव, अमरावती, अहिल्यानगर,नाशिक, सातारा, बुलढाणा नांदेड ,लातूर, जळगाव, सातारा, सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.