सीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनींची ओवाळणी: 'एक राखी' ठरतेय बारा हत्तींचे नैतिक बळ!
schedule25 Aug 26 person by visibility 100 categoryसामाजिक
◼️महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते दोन लाखांहून अधिक राख्या जवानांना प्रदान; छत्रपती ताराराणींच्या नावाने सैनिकी स्कूल व मुलींसाठी लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा
कोल्हापूर : कारगिल युद्धापासून सलग सत्तावीस वर्षे सुरू असलेल्या 'एक राखी सीमेवरील जवानांसाठी' या देशरक्षण उपक्रमांतर्गत यंदा दोन लाखांहून अधिक राख्यांचे जवानांना प्रदान करण्याचा सोहळा महादेव मंदिर मराठा बटालियन टी ए च्या प्रांगणात अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनी व महिलांनी जवानांना राख्या बांधून देशरक्षणासाठी तत्पर असणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून वरून बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितले की, छत्रपती ताराराणींच्या नावाने सैनिकी स्कूल आणि मुलींसाठी लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची ट्रस्टची गेल्या दहा वर्षांपासूनची मागणी असून, ताराराणींच्या त्रिशताब्दी वर्ष व माझ्या महापौरपदाच्या कारकिर्दीत ही मागणी पूर्ण करण्यासाठी मी जातीने प्रयत्न करेन. तसेच, 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने देशरक्षणात महिला कुठेही मागे नाहीत हे सिद्ध झाले असून, करवीरच्या मुलींनी संरक्षण क्षेत्रात धडाडीने पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ऑनररी लेफ्टनंट कर्नल संतोष सकुंडे यांनी, करवीर भगिनींनी पाठवलेल्या या राख्यांमुळे सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना बारा हत्तीचे नैतिक बळ मिळते, असे गौरवोद्गार काढले. कोल्हापूरची ही लष्करी परंपरा आता महिलाही पुढे नेत आहेत, असे ते म्हणाले. सुरुवातीला अध्यक्ष किशोर घाटगे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या २७ वर्षांच्या कार्याची माहिती दिली, तर एन. एन. पाटील सांगावडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, छत्रपती शाहू हायस्कूल, चाटे स्कूल आणि तक्षशिला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड, ऑनररी लेफ्टनंट शामराव साळवी, ऑनररी लेफ्टनंट राजेश सावंत, नगरसेविका व प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती शीला सोनुले, माजी महापौर व नगरसेविका माधवी गवंडी, नगरसेविका दीपा काटकर, नगरसेविका माधुरी नकाते, नगरसेविका रेखा उगवे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका नीलिमा पाटील, नगरसेविका वंदना मोहिते यांसह मोठ्या संख्येने महिला व शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष किशोर घाटगे, सचिव राजेंद्र मकोटे, कमलाकर किलकीले, महेश कामत, डॉ. सायली कचरे, यशश्री घाटगे, अशोक लोहार, सीमा मकोटे, प्रशांत बरगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.