कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द न करणाऱ्या महायुतीचे १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पराभूत करण्याचा निर्धार कोल्हापुरात सोमवारी झालेल्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत शेतकऱ्यांनी ठरावाद्वारे केला. कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे सोमवारी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद पार पडली. परिषदेचे उद्घाटन खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले.
गोवा ते नागपूर अशा 805 किलोमीटर लांबीच्या 86 हजार कोटी नियोजित खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग हुकूमशाही पद्धतीने लादण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने 28 फेब्रुवारी व 7 मार्च 2024 च्या गॅझेट नोटिफिकेशन द्वारे घेतला.
याच दिशेला जाणारे पर्यायी दोन महामार्ग असताना या अनावश्यक अशा शक्तिपीठ महामार्गाची योजना सरकारने केली. या महामार्गामुळे 27 हजार एकर जमीन 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जाणार आहे. कोल्हापुरातील 5 281 एकर जमीन ही संपादित केली जाणार आहे. मार्च महिन्यापासूनच कोल्हापुरातील शेतकरी हे अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. 4 एप्रिल रोजी सर्वपक्षीय निर्धार मेळावा घेऊन या विरोधात एकत्रित लढण्याचा निर्धार झाला. सर्वप्रथम कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर 11 मार्च रोजी व नंतर 18 जून रोजी भव्य मोर्चा काढून शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला होता. मंत्र्यांना कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरातील सहा तालुक्यांमध्ये या विरोधात जनजागृती मिळावे व रास्ता रोको आंदोलने झाली. एवढ्या सर्व गोष्टी घडत असताना देखील फक्त शब्दांची फिरवा फिरव करण्यापलीकडे माहिती सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. याबद्दल कोल्हापूर सहित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर आज परिषद पार पडलेल्या परिषदेमध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्द न करणाऱ्या महायुतीचे १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पराभूत करण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला.
यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्ली राज्य सहसचिव डॉ. प्रा. अमृता फाटक, गिरीश फोंडे, उद्धवसेनेचे नेते विजयदेवणे, प्रकाश पाटील, विक्रांत पाटील, सुभाष जाधव, आनंदा पाटील, दादा पाटील, योगेश कुळवमोडे, के. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. खासदार शाहू छत्रपती म्हणाले, राजकीय परिवर्तन झाल्याखेरीज शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही. गिरीश फोंडे म्हणाले, महायुती सरकारने महामार्ग रेटण्याचे ठरवलेले होते. त्यामुळे आंदोलन सुरू असतानाही त्यांनी कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही.
परिषदेत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शिवाजी मगदूम यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब पाटील यांनी आभार मानले.