स्टार्टअप्सनी भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. सी. एस. यादव; केआयटी आय.आर.एफ. च्या कोहॉर्ट-२.0 या उपक्रमाचे उद्घाटन
schedule17 Oct 25 person by visibility 88 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : केआयटी चे इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (आय.आर.एफ.) आणि केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोहॉर्ट-२.0 या स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन वाढविणाऱ्या उपक्रमाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंद्रशेखर यादव, वैज्ञानिक-सी, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, हे होते.
डॉ. यादव यांनी आपल्या मार्गदर्शनपर संवादात सांगितले की, भारतातील स्टार्टअप्स आणि इनक्युबेशन सिस्टीम्स हे देशाच्या आत्मनिर्भरतेकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल आहे. भारत सरकार विविध योजनांद्वारे आणि निधी योजनांद्वारे नवउद्योजकांना प्रोत्साहन देते, म्हणून प्रत्येक स्टार्टअपने अशा योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा. त्यांनी डी.एस.टी. व अन्य सरकारी विभागांमार्फत नवोपक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या निधी व सुविधा यांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना आणि उद्योजकांना त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी डॉ. यादव यांनी कोहॉर्ट-२.0 अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व स्टार्टअप्सचे स्वागत केले आणि त्यांच्या प्रगती अहवालांचे सादरीकरण पाहून कौतुक केले. कार्यक्रमानंतर त्यांनी केआयटी आय.आर.एफ. मधील विविध विभागांचा – प्रशासकीय कार्यालय, स्टार्टअप कोवर्किंग स्पेस, स्टार्टअप क्युबिकल्स, एआयसीटीई आयडीया लॅब आणि सेंटर ऑफ एक्सेलन्सचे प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय नेहमीच इनोव्हेशन आणि उद्योजकता विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करते. त्यांनी महाविद्यालयाकडून केआयटी आय.आर.एफ.ला दिल्या जाणाऱ्या तांत्रिक व पायाभूत सुविधांच्या सहाय्याचा उल्लेख करत, नवकल्पनांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. केआयटी आय.आर.एफ ने गेल्या दोन तीन वर्षात जी काही यशस्वी वाटचाल केलेली आहे भविष्यासाठी मजबूत पायाभरणी केलेली आहे
याबद्दल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आरळी तसेच त्यांची पूर्ण टीम यांचे मनापासून अभिनंदन केले.एवढ्या कमी वेळात असे दृश्य काम करणारे,केआयटी हे एकमेव कॉलेज असेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.अशा प्रकारचे काम यशस्वीरित्या पुढे नेण्यासाठी.त्याचा विस्तार होण्यासाठी योग्य ते मनुष्यबळाची सुद्धा पूर्तता करण्यात आली आहे असे ते म्हणाले.
केआयटी आय.आर.एफ.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुधीर आरळी यांनी आपल्या भाषणात विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्सच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, सध्या केआयटी आय.आर.एफ.अंतर्गत ३१ स्टार्टअप्स इनक्युबेट आहेत व १० स्टार्टअप कल्पनांना एकूण रु.४६ लाखांची इग्निशन ग्रँट देण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की केआयटी आय.आर.एफ या स्टार्टअप्सना निधी, मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य आणि नेटवर्किंग संधी प्रदान करते. श्री.आरळी यांनी पेटेंट-ओ-थॉन आणि आयडीया थॉन हे केआयटी आय.आर.एफ चे दोन प्रमुख भावी उपक्रम सादर केले, ज्यांत विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील. तसेच संस्थेतून पेटंट व्यावसायिकीकरण, पेटंट फाइलिंग शुल्क परतावा, नवकल्पक कल्पनांचे पेटंट फाइलिंग, व उत्कृष्ट पेटंट किंवा आयडिया यांना स्टार्टअप करण्यासाठी लागणारा सपोर्ट देण्यात येईल आणि लवकरच सुरू होणाऱ्या हॅकॅथॉन बद्दलही त्यांनी माहिती दिली.
केआयटी संस्थेचे अध्यक्ष, साजिद हुदली, उपाध्यक्ष, सचिन मेनन, आणि सचिव, श्री. दीपक चौगुले, यांनी केआयटी आय.आर.एफ.च्या टीमला कोहॉर्ट-२.0 नियोजनासाठी प्रोत्साहन दिले.कार्यक्रमास स्टार्टअप संस्थापक, मार्गदर्शक आणि केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालया चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध वक्त्यांच्या मार्गदर्शनातून उद्योजकीय व इनोव्हेशन विषयात प्रेरणा घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पुनसकर (इनक्यूबेशन मॅनेजर – स्टार्ट अप्स आणि प्रोग्रॅम) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. देवेंद्र पाठक (इनक्यूबेशन मॅनेजर-बिझनेस आणि ऑपरेशन) यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन श्री. ऋषिकेश दूधगांवकर (इनक्यूबेशन असोसीएट – इव्हेंट अँड प्रोग्राम), श्री. पार्थ हजारे (इनक्यूबेशन असोसीएट – कनेक्ट अँड आऊट्रीच) आणि श्री. संदीप लाड (अकाउंटंट कम एडमिन) यांनी पाहिले. केआयटी आय.आर.एफ.मधील सर्व इंटर्न्सनी उत्कृष्ट समन्वय व नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा हातभार लावला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी,कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग,महाराष्ट्र शासन व डी.एस.टी.निधी आय.टीबीआय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचे सहकार्य लाभले.