मुंबई : जिथे आपला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार द्यायचे, तर इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध असणाऱ्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, तसेच एससी-एसटी आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार द्यायचे नाहीत, मात्र तिथे आपल्या भूमिकेला पाठिंबा असणाऱ्यांच्या मागे उभे राहायचे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत मात्र, राज्य सरकारने त्यांच्या मागणीसंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आज (२० ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही? याबाबतचा कौल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारत त्यांचं मत जाणून घेतले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. ‘ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच जो मतदारसंघ राखीव असेल त्या ठिकाणी जर उमेदवार आपल्या विचाराचा असेल मग तो उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल तरीही त्या उमेदवाराला आपण मदत करायची. मग त्या ठिकाणी आपण उमेदवार उभा करायचा नाही. मात्र, त्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असं लिहून घ्यायचं’, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.